













"बॉलिवुड'वर ठसा उमटवणारा शाहरुख खान सध्या "आयपीएल'च्या क्रिकेट स्पर्धेमुळे चर्चेत आहे. गेले दीड तप हिंदी चित्रपटसृष्टी ज्यांच्याभोवती केंद्रित झाली आहे, त्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये शाहरुख खानचा म्हणजे "किंग खान'चा समावेश होतो. छोट्या पडद्यावरून कारकिर्दीला प्रारंभ करून "सुपरस्टार' पदापर्यंत पोचलेला हा अभिनेता अनेकदा चर्चेत असतो; पण सध्या तो चर्चेत आहे क्रिकेटमुळे. "आयपीएल' स्पर्धेतील "कोलकता नाईट रायडर्स'ची मालकी त्याच्याकडे आहे. गेले दोन महिने तो या संघाच्या प्रसिद्धीसाठी आणि यशासाठी धडपड करतो आहे. त्यामुळे; तसेच कधी कर्णधार सौरभ गांगुलीबरोबर असलेल्या मतभेदांमुळे, तर कधी खेळाडूंबरोबर बसण्याच्या आग्रहामुळे तो बातम्यांचा विषय बनला आहे. दिल्लीच्या मोहल्यामध्ये लहानाचा मोठा झालेल्या शाहरुखचे वडील ताज महंमद खान हे स्वातंत्र्यसैनिक. त्याची आई लतिफ फातिमा ही मेजर जनरल शाहनवाझ खान यांची मुलगी. शाहनवाझ खान यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये सहभागी होऊन स्वातंत्र्यासाठी लढा दिलेला. भारताला स्वातंत्र्य मिळणार ते फाळणी होऊनच याची कुणकूण लागलेल्या ताज महंमद खान यांनी, भारत हीच आपली मातृभूमी आहे, असे सांगत पेशावरहून मुक्काम दिल्लीला हलविला. भारतात आल्यानंतर ताज महंमद यांनी राजकारणामध्ये प्रवेश न करता आपले अभियांत्रिकी कौशल्य अजमावीत नोकरी सुरू केली. शाहरुखच्या आईने ऑक्सफर्डमध्ये घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून घेण्याचे ठरविले. "फौजी'ने सुरवात सेंट कोलंबिया शाळेत असताना शाहरुखने अष्टपैलू विद्यार्थ्यांसाठी असलेली तलवार जिंकली. पुढे हंसराज महाविद्यालयातून अर्थशास्त्रामध्ये पदवी घेतल्यानंतर त्याने जामिया मिलियामधून जनसंज्ञापनशास्त्रातील पदव्युत्तर पदवीही घेतली. त्याला पत्रकार होण्याची इच्छा होती; परंतु त्याने अभिनयाच्या क्षेत्रात नशीब आजमाविण्याचे ठरविले. घरच्यांच्या परवानगीने तो छोट्या पडद्यावरील भूमिकेसाठी निर्मात्यांचे उंबरठे झिजवू लागला. त्याला पहिली संधी मिळाली ती "फौजी' या मालिकेत. "आय से चॅप्स' या संवादामुळे ही मालिका खूप लोकप्रिय झाली. त्यानंतर अझीझ मिर्झा यांच्यासारख्या नामवंत निर्मात्याने त्याला "सर्कस' या मालिकेत संधी दिली. याच काळात शाहरुखला अरुंधती रॉय यांनी लिहिलेल्या एका इंग्रजी चित्रपटातही छोटी भूमिका मिळाली. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलेल्या "दिल आशियाना है' या चित्रपटात शाहरुखला मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. पण हा चित्रपट साफ आपटला. १९९२ मध्ये शाहरुखचा "दिवाना' झळकला आणि तो लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झाला. याचदरम्यान त्याने आपला मुक्काम दिल्लीतून मुंबईत हलविला आणि गौरीबरोबर हिंदू पद्धतीने विवाहही केला. "दिवाना'नंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. "डर', "बाजीगर'पासून त्याची यशोमालिका सुरू झाली. "राजू बन गया जंटलमन', "कभी हां कभी ना' यांसारख्या चित्रपटांनी विक्रम केले. यश चोप्रा यांच्या यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली "दिलवाले दुल्हनियॉं ले जायेंगे' प्रसिद्ध झाला आणि एका रात्रीत शाहरुख स्टार झाला. या चित्रपटाने उत्पन्नाचे नवे विक्रम प्रस्थापित केले. अभिनेता म्हणून यश मिळत असतानाच शाहरुख निर्माता झाला. प्रथम जुही चावलाबरोबर आणि नंतर करण जोहरबरोबर चित्रपटांची निर्मिती करून त्यामध्येही त्याने स्थान निर्माण केले. बॉक्स ऑफिसवर "हीट' होणाऱ्या चित्रपटांबरोबरच "माया मेमसाब', "हे राम' यांसारख्या पठडीच्या बाहेरच्या चित्रपटांतही त्याने काम केले. "मै हूं ना', "स्वदेस' यांबरोबरच गेल्याच वर्षी प्रसिद्ध झालेल्या "चक दे इंडिया'ने शाहरुखला पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे बक्षीस मिळवून दिले. या काळात तो कधीही अनावश्यक वादामध्ये अडकला नाही. हिंदी चित्रपटसृष्टीचा सम्राट असलेल्या अमिताभ बच्चनबरोबर त्याची तुलना सुरू झाली. छोट्या पडद्यावर "कौन बनेगा करोडपती' या मालिकेमध्ये अमिताभची जागा त्याने घेतल्यावर तर ही तुलना अधिक होऊ लागली. आता "क्या आप पॉंचवी पास है'द्वारे तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकला आहे. या प्रवासात शाहरुखने विविध प्रकारचा अभिनय केला. अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. अगदी वेगळ्या आवाजात तोतरे बोलण्यापासून ते "सिक्स पॅक बॉडी'पर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी त्याने अमाप कष्ट घेतले आहेत. कोणतीही गोष्ट भारावून जाऊन, झपाटल्यासारखी करण्याबाबत त्याची ख्याती आहे. एखादी गोष्ट हातात घेतली, की यशस्वी होण्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी असते. "आयपीएल'च्या संघाबाबत तेच होते आहे. पराभूत होणे त्याला मान्यच नाही. गांगुलीबरोबर त्याचे असलेले मतभेद याचमुळे होत असणार. कारण चित्रपटात होते ते प्रत्यक्षात होत नाही किंवा प्रत्येक कथानकाचा शेवट आपल्या मर्जीप्रमाणे वास्तव आयुष्यात करता येत नाही, हे शाहरुखला माहिती असले तरीही उमगलेले नाही. साहजिकच त्याची अपेक्षा प्रत्येक वेळा "चक दे'चीच आहे.